<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>बंगाली भाषा ही इंडो - आर्यनच्या पूर्वेकडील शाखांपैकी एक मानण्यात येते . साधारणतः इसवी सनाच्या ९५० ते १३५० या कालखंडात बंगाली भाषेचे ज्ञात आदिस्वरूप आढळात येते . बंगाली भाषा व साहित्य यांचे हे ‘प्राचीन युग ’ म्हणता येईल यानंतर १३५० - १८०० या काळात प्राचीन भाषेने बाळसे धरून तिचा साहित्यानुकूल अंगाने विकास झालेला दिसतो . हे ‘ मध्य युग ’ मानण्यात येते . १८०० पासून १९४१ ( किंवा १९४७ ) पर्यंत बंगालीचे ‘ नवयुग ’ आणि नंतरचा आजतागायतचा कालखंड ‘ आधूनिक युग ’ म्हणून ओळखता येईल . मध्ययुगाचेही दोन सुस्पष्ट विभाग पडतात . १३५० ते १५०० या दिडशे वर्षांत भाषेवर वैष्णवतीर्थ वृंदावन ( मथुरा ) येथे प्रचलित असणाऱ् या ‘ ब्रजबुली ’ चा बलवत्तर प्रभाव जाणवतो . या काळातील बरीच उपलब्ध रचना वैष्णव पंथाच्या पदावलींची असून केवळ बंगालमधीलच नव्हे , तर आसाम - ओरिसामधील तत्कालीन कवींवरही हा प्रभाव दिसून येतो . परिणामी पूर्व भारताच्या या विशाल भूखंडातील सर्व उदयोन्मुख भाषा या काळात सारख्याच तोंडवळ्याच्या भासतात . लौकिक वा अपभ्रष्ट ( अवहठ्ठ ) परंपरेने जाणाऱ् या उमापती ( सु . चौदावे शतक ) व विद्यापती ( सु . पंधरावे शतक ) यांसारख्या मैथिली पूर्वसूरींच्या समर्थ रचनांनी घालून दिलेले आदर्शच या भागात पुढे बराच काळ अनुसरणात राहिले . १५०० – १८०० हा मध्ययुगाचा उत्तरार्ध वैष्णव साहित्याच्या वैभवकाळासाठी प्रसिद्ध आहे .</span></p> <p style="text-align: justify; ">विद्यमान पश् चिम बंगालच्या भागात या काळात आकारास आलेली प्रौढ , परिणत भाषाच पुढे बंगालीचा प्रधान प्रवाह म्हणून किंवा तिचे मान्य , स्वीकृत असे रूप म्हणून प्रचलित होतांना आढळते. मिथिलेपासून सिल्हेट ( श्रीहट्ट ), चितगॉंग ( चट्टग्राम ) पर्यंत आणि नेपाळ-आसामपासून उत्कलपर्यंतच्या विविध प्रादेशिक प्रवाहांनी या मुख्य प्रवाहात भर घातली . सर्वांचा पाहुणचार घेऊन या यजमानभाषेने आपला घाट सुदृढ आणि सौष्ठवपूर्ण घडवला . आजमितीस अंदाजे बारा कोटींवर लोकांची मातृभाषा असणारी बंगाली ही भारताच्या सीमेपार बांगला देश या स्वतंत्र , सार्वभौम राष्ट्राचीही राजभाषा आहे . भारतातही पश् चिम बंगालच्या चतुःसीमांपलीकडे बंगाली भाषिकांची वस्ती चहुकडे विखुरली आहे. ‘ प्रवासी ’ बंगाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (‘ प्रवासी ’ म्हणजे बंगालबाहेर वस्ती करून राहणारे बंगाली ) या बंगाली भाषिक जनांनी आपला गौरवशाली वारसा अभिमानाने जपला असल्याने भाषा आणि साहित्य यांच्या प्रगतीस हातभार लागला आहे .</p> <p style="text-align: justify; ">विद्यमान लिखित बंगालीतही साधुभाषा व चलितभाषा असे दोन शैलीगत प्रकारभेद आहेत . सोळाव्या शतकातील प्रौढ , संस्कृताश्रिता , रूपसी ( आलंकारीक ) शैली पुढे तीनशे वर्षांत साहित्याचे माध्यम म्हणून चांगलीच नावारूपास आली . प्राचीन , पारंपारीक , आलंकारिक , अवडंबरयुक्त अशी ही साधुशैली म्हणून सुशिक्षितांच्या विचारांचे वाहन बनली , तर सहज , सुगम , बाळबोध , देशी शब्द अधिक पसंद करणारी चलित शैली सर्वसामान्य जनतेच्या भावभावना व्यक्त करणारी ठरली . चलित शैलित क्रियापदांची व सर्वनामांची रूपे ही ग्रांथिक व्याकरणशुद्ध पाठानुसार न राहता उच्चरानुसारी लौकक अंगाने लिहिली जातात . उदा ., मराठीतील केलं , झालं वगैरेप्रमाणे . रविंद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने विसाव्या शतकात प्रमथ चौधुरी यांनी चलित शैलीचा प्रसार करण्यासाठी व तिला शिष्टसंमत दर्जा प्राप्त करून देण्यासाठी खटपट केली . स्वामी विवेकानंद , रविंद्रनाथ प्रभृती थोर पुरूषांच्या उत्स्फूर्त लेखन - वक्तृत्वामुळेही चलित शैलीसंबंधीचा आदर व स्विकार वाढला . आजमितीस साधुभाषा वृत्तपत्रांच्या अग्रलेखांतून अथवा विद्वज्जड प्रबंधांतूनच काय ती आढळते .</p> <h3 style="text-align: justify; ">प्राचीन युग</h3> <p style="text-align: justify; ">बंगाली भाषेचे सर्वांत पुरातन असे जे दाखले आढळतात , त्यांची धाटणी अपभ्रंशाच्या प्रभावातूनच अलीकडेच सर्वस्वी मुक्त झालेल्या अशा एका नवजात भाषेची वाटते . प्राचीन बंगालीचा प्रत्यय ‘ चर्यागीति ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ् या काही पदांतून व पदखंडांतून येतो . १९१६ मध्ये महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांना नेपाळ दरबारच्या पोथीखान्यात सापडलेल्या काही हस्तलिखितांवरून या पदांचा सुगावा लागला . या चर्यागीतांचे कवी महायान बौद्धांच्या तांत्रिक व यौगिक संप्रदायांतील सिद्धाचार्य होते . या गीतांची भाषा सांकेतिक आहे . तिला ‘ संध्या भाषा ’ ( सुषुप्ती आणि जागृती यांच्या संधिरेषेवरील भाषा किंवा अज्ञानांधकार व प्रबोधोदय यांच्या संधिकाळाची भाषा ) असे म्हणत . प्रत्येक गीताचा वरवरचा अर्थ साधारण श्रोत्यांना समजतो . त्याखेरीज निगूढ असा एक आशय त्यात असतो . ही ‘ अंदर की बात ’ सांप्रदायिक साधकांनाच अध्ययन , चिंतन आणि अनुभव यांमुळे उमगते . चर्यागीतांची हीच परंपरा थेट अठराव्या शतकापर्यंत बाऊल पंथीय गायकांच्या गीतांत चालत आलेली दिसते .</p> <p style="text-align: justify; ">चर्यागीतांचे कवी अकरावे ते तेरावे शतक या काळातील आहेत . त्यांच्यापैकी सर्वांत प्राचीन कवी म्हणजे ‘ लोई ’ ( लुयीपाद किंवा लुईपा ). हा अकराव्या शतकातील असावा . कान्ह ( कृष्णपाद ), भुसुकू , शांती , ढेंढण, सराह , दारीक , महिंडा इ . तत्कालीन कवींच्या स्फुट रचना वा अवतरणे उपलब्ध आहेत . साहित्याच्या इतिहासातच नव्हे , तर भारतीय संस्कृती , धर्म , तत्त्वज्ञान , समाजशास्त्र इत्यादीं च्या अभ्यासातही या सिद्धाचार्यांच्या गीतभांडाराचे स्थान महत्वपूर्ण आहे . [→ सिद्ध ]. पराकोटीची भक्तीभावना , गुरूच्या चरणी आत्मसमर्पणाची वृत्ती आणि पराकाष्ठेची लीनता असे नंतरच्या भक्तीवाङ्मयात आढळणारे विशेष या चर्यागीतांत ठळकपणे जाणवतात . ‘‘ बलद बिआएल गाविआ बांझे । पिटा दुहिए ए तिना सांझे । जो सो बुधी सोई निबुधी । जो सो चौर सोई दुबाधी ’’ ( बैल व्याला , वांझ झाली गाय । देतसे तो दूध तिन्ही त्रिकाळ । कळे हे ज्यासी तोचि नकळे । चोर जो तोचि कोतवाल ठरे ) या ओळी ढेंढण कवीच्या एका कूटातील आहेत . अशी कूटरचना मध्ययुगीन सर्वच भारतीय भाषा - साहित्यांतून आढळते . भाषाशास्त्रदृष्ट्या या गीतांची भाषा प्राचीन बंगाली ठरवली तरी तिला प्राचीन ओडिया व प्राचीन असमिया म्हणणेही अवाजवी ठरणार नाही . मात्र बंगालीच्या नंतरच्या इतिहासात या भाषेची उत्क्रांती व परिणती दृष्टीस पडत असल्याने हिला ‘ प्राचीन बंगाली ’ निर्विवादपणे म्हणता येईल .</p> <h3 style="text-align: justify; ">मध्ययुग</h3> <p style="text-align: justify; ">बंगाली साहित्याच्या इतिहासाचे प्राचीन पर्व संपुष्टात येते साधारणतः १३०० साली . एके काळी बौद्ध धर्माचे एकछत्री आ धिपत्य असणारा वं गदेश १००० - १२०० या काळात पाल , चंद्र , वर्मन आणि सेन राजवंशांच्या कारकिर्दीत पुनश् च हिंदू धर्मानुयायी बनला होता . साहित्य , संगीत , शिल्पकला , भक्तीपंथ इ . अनेक अंगांनी संस्कृतीचा विकास झाला होता . विशेषतः सेन राजांच्या ( १००० - १२०० ) अमदानीत स्थैर्य व सुबत्ता नांदत होती . तेराव्या शतकाच्या आरंभी तुर्कांच्या स्वाऱ् या सुरू झाल्या आणि हे चित्र पालटले . एकामागोमाग एक भाग तुर्कांच्या टाचेखाली येत गेला आणि चौदाव्या शतकाच्या मध्यास सर्वच प्रदेश मुसलमानी सत्तेखाली आला . राष्ट्र जीवनातील खडतर अशा या काळात देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रे , मंदिरे , बौद्ध विहार इ . होरपळून निघाले . साहित्य आणि पांडित्य देशोधडीस लागले . अनेकांनी सुदूर नेपाळमध्ये आश्रय घेतला . बंगाली साहित्याच्या इतिहासात ही दोनशे वर्षे म्हणते एक तमोयुग आहे . १२०० पासून १४०० पर्यंतच्या काळातील कोणतीही बंगाली साहित्य कृती आज तरी उपलब्ध नाही . मात्र या काळात तेथे अगदी स्मशान शांतता होती असे म्हणणेही गैर ठरेल . तुर्कांच्या राज्यात बंगाली मनाला काही नवा अनुभव लाभला . संस्कृत विद्येच्या अध्ययन - अध्या पनावर गदा आल्याने विद्वानाचे लक्ष देशी भाषांच्या उन्नतीकडे वळले . पूर्वापार जनसामान्यांच्या तोंडी खेळत आलेल्या कहाण्या आणि कवने , पुराणकथा आणि लोकवाङ्मय , उखाणे आणि गीते यांना प्राधान्य मिळाले . धार्मिक आणि नैतिक विचारांचे माध्यम म्हणून त्यांचा उपयोग होऊ लागला . या मंथनातूनच नंतरच्या शतकातील विशिष्ट साहित्य प्रकारांचा उद्गम आणि विकास झाला . ‘ मंगल ’ काव्यातील आधारभूत कहाण्या या अंधारयुगातच अंकुरत होत्या . याच काळात फारसी भाषेच्या परिचयाने बंगाली भाषेस नवा तकवा लाभला . बंगाली छंदोरचनेतही त्या काळात जुन्या मात्रारीती ऐवजी अक्षररीतीचे म्हणजे जातिवृत्तांऐवजी अक्षरवृत्तांचे प्रचलन झाले . संभावित हिंदू पंडित- पुरोहि वर्गाचा ऱ् हास झाला , त्याचवेळी समाजातील कनिष्ठ मानल्या गेलेल्या वर्णातील विद्या - कलांनी उचल खाल्ली , ह्या वर्गात मौखिक परंपरेने खेळत आलेल्या गीतांना आणि कथांना , त्यांच्या देवदेवतांना , त्यांच्या समजुतींना आणि श्रद्धांना खतपाणी मिळाले . चर्यागीतकर्त्या सिद्धांची आणि अवधूतांची परंपरा पुन्हा सजीव झाली . याच काळात नाथपंथी साहित्याचा विकास होऊ लागला . ‘ मनसा ’ आणि ‘ धर्म ’ या देवतांची पूजा वाढू लागली .</p> <p style="text-align: justify; ">तत्कालीन बंगाली साहित्य सर्वस्वी पद्यमय होते आणि ते पद्य मृदंग , करताल किंवा एकतारी सारख्या वाद्यांच्या साहाय्याने गाण्यातून अथवा सूर व ताल यांच्या ठेक्याने नृत्यांतून अभिव्यक्त होई . कवन दिर्घ व आख्यानमूलक असे तेव्हा गायन प्रसंगी देवदेवतांची आणि आख्यानांतील त्या त्या पात्रांची ‘ पाँचालिका ’ प्रेक्षकांसमोर खेळवीत . पाँचालिका म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा वा कठपुतळीचा खेळ . या दृक् - श्राव्य कार्यक्रमामुळे आख्यानमूलक दीर्घ गेय काव्ये ‘ पॉंचालिका ’ अथवा ‘ पॉंचाली ’ या सामान्य नामानेच ओळखली जाऊ लागली . बरीचशी आख्यानकाव्ये विविध देवतांच्या महात्म्यपर होती . त्यांचे कर्ते , कथेकरी व श्रोते या सर्वांचेच त्यामुळे मंगल होईल अशी फलश्रुती त्यात असल्याने ‘ मंगल ’ काव्ये हे त्यांचे अभिधान रूढ झाले .</p> <p style="text-align: justify; ">आजवर जेवढी मंगलकाव्ये उपलब्ध झाली आहेत त्यांपैकी कोणतेही १४०० पूर्वीची नाही . पौराणिक गेय आख्यानांत कृत्तिवास ओझा ( १३९९ - १४८० ) यांचे श्रीराम पॉंचाली वा रामायण पॉंचाली सर्वात जुने मानले जाते . मात्र कृतीवासाच्या कृतीची मृळ संहिता उपलब्ध नसल्याने जन्मकाळी हे रामायण आकृतीप्रकृतीने कसे होते , याविषयी निश् चित विधान करणे अवघड आहे . त्याच्या काव्याच्या जनप्रियतेमुळे प्रत्येक पिढीतील गायकांनी त्यात भर टाकली असण्याची शक्यताही आहे .</p> <p style="text-align: justify; ">चौदाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात बंगालमध्ये दिल्लीच्या पातशाहांची सत्ता झुगारून देऊन शमसुद्दीन इल्यासशाह याने आपली स्वतंत्र सुलतानी रियासत स्थापन केली . या कामी मातबर बंगाली हिंदूंचे साहाय्यही त्याला लाभले . सुलतानांच्या कारकीर्दीत मंत्रिपदे व इतर दरबारी अधिकारपदे जवळजवळ अखेरच्या घडीपर्यंत हिंदू मुत्सद्दीच भूषवीत होते . कित्येक सुलतानांनी आणि सरदारांनी बंगाली साहित्यांचा आस्वाद घेतला . कवींचा, गुणीजनांचा , पंडितांचा आदरसत्कार केला आणि विद्या - कलांना उत्तेजन दिले . रचनाकाल निश् चितपणे माहीत असलेली प्राचीनतम बंगाली साहित्याकृती एका राजसेवकाचीच आहे . सुलतान रुक्नुद्दीन बार्बक शहाने ‘ गुणराज खान ’ असा दरबारी किताब बहाल केलेला हा कवी म्हणजे मालाधर बसू .</p> <p style="text-align: justify; ">मालाधरच्या ग्रंथाचे नाव आहे श्रीकृष्णविजय . हे मंगलकाव्य पॉंचालिकाच आहे . यात कवीने सरळ , सुबोध शैलीने कृष्णलीला निवेदन केली आहे . विष्णुपुराण , हरिवंश आणि श्रीमद्भागवत यांच्या आधारे त्याने कथा गुंफली आहे . मधूनच काही अपौराणिक लोककथाही त्यात आढळतात . रचनासमाप्तीचा काळ शके १४०२ ( इ . स . १४८० ) असा नमूद आहे . कृष्णचरित्र हा त्याकाळी अतिशय लोकप्रिय विषय होता . जेव्हा चैतन्यांच्या भक्तीपंथाचा प्रसार वाढला , तेव्हा तर ही जनप्रियता शिगेस पोहोचली . सोळाव्या व सतराव्या शतकांत कितीतरी चांगली कृष्णमंगल काव्ये लिहिली गेली .</p> <p style="text-align: justify; ">महाभारताचा मागोवा घेऊन लिहिलेले पहिले बंगाली काव्य पांडवविजय हे होय . चाटिगांवचा ( चितगॉंग ) सुभेदार परागल खान व त्याचा पुत्र शाहजादा नस्त्रतखान यांच्या आग्रहावरून ‘ कवींद्र ’ उपाधिविभूषित राजकवी परमेश् वर दास याने या काव्याचा प्रपंच केला . पांडवविजयातील अश् वमेधाख्यान फार त्रोटक झालेले वाटून नस्त्रतखानाने जैमिनीय संहितेतील त्या प्रसंगाच्या रसाळ वर्णनाबरहुकूम एक नवीन पॉंचालीका दरबारी कवी श्रीकर नंदी याच्याकडून लिहवून घेतली .</p> <p style="text-align: justify; ">राधाकृष्णांच्या रासक्रीडेच्या ज्या कहाण्या त्या काळी अशिक्षित किंवा अल्प शिक्षित समाजांत रूढ होत्या , त्या उत्तान व शृंगार रसप्रधान होत्या . साहजिकच शिष्ट काव्यांच्या चर्चेत त्यांना स्थान नसे . परंतु पुढे दोन काव्यग्रंथ अशा गुणवत्तेचे निघाले , की वर्ण्यविषय कृष्णक्रीडा असूनही ते सर्वमान्य ठरले . चंडीदास - बडू ( १४१७ ? - ७७ ? ) कवीचा श्रीकृष्णकीर्तन व भवानंद कवीचा हरिवंश ( सु . सतरावे शतक ) हे ते दोन ग्रंथ . चंडीदास - बडू हा बासली वा बाशूली ( काली ) देवतेच्या मंदिरातील पुजारी होता . बाराव्या शतकाच्या आरंभी जयदेवाने लिहिलेल्या गीतगोविंद या संस्कृत काव्याचा प्रभाव श्रीकृष्णकीर्तन या काव्यावर जाणवतो . सरळसोट कथानिवेदन न करता चंडीदासाने गीतगायनाची रीती स्वीकारली आहे . या गीतांना जुळवून घेणारे गेय संस्कृत श् लोक तो ठिकठिकाणी पेरतो . त्यावरून त्याचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जाणवते . ही रचनापद्धती त्या काळी पंडितजनांत ‘ वाग्वेणी ’ म्हणून व लोकांत ‘ झुमुर ’ म्हणून ओळखली जाई . भक्तिकाव्य असूनही मानवी भावभावना आरोपित केल्याने पात्रांचा स्वभावपरिपोष हृदयंगम उतरला आहे . दानखंड ( करवसुली ), नौकाखंड , भारखंड , छत्रखंड आदी प्रकरणातील राधाकृष्णांच्या लीला रसाळ , भावोत्कट आणि भाषादृष्ट्याही आस्वाद्य ठरतात . मध्ययुगातील बंगाली गीतकवींमध्ये या चंडीदासाचे स्थान साहजिकच मानाचे आहे .</p> <p style="text-align: justify; ">‘ कृष्णमंगल ’ या साधारण संज्ञेने निर्देशित होणारी काव्ये इतर मंगलकाव्यांहून पृथगात्म आहेत . कृष्णमंगल काव्यांतील गीते कुणा देवदेवतांच्या पूजापाठादी आन्हिकाचे अभिन्न अंग नव्हती . अन्य पॉंचालिका व मंगलगीतिका मात्र सर्रासपणे विश्ष्टि देवदेवींच्या पूजाअर्चेसाठी आळविली जात . धर्मठाकूर हा देव तसेच मनसा व चंडी या दोन देवी यांची स्तोत्रेच या पॉंचालिकांत असत . या धाटणीच्या काव्याचे सर्वांत जुने उदाहरण म्हणजे विप्रदासविरचित मनसाविजय किंवा मनसामंगल काव्य . याचा रचनाकाल १४९४ आहे . सर्वांत जुने चंडीमंगल काव्य म्हणून कविकंकण मुकुंद चक्रवर्ती याच्या ग्रंथाकडे बोट दाखवावे लागते . मेदिनीपुरनजीकच्या आड्डा या लहानश्या राज्याचा ब्राह्मण अधिपती बांकुडा राय याच्या आश्रयाने मुकुंद कवीने आपले चंडीमंगल ( १५५५ ) काव्य पूर्ण केले .</p> <p style="text-align: justify; ">पौराणीक शिवपार्वतीच्या कथेचा गाभा त्याने घेतला असला, तरी लोकमानसांतील रूढ कहाण्यांचा त्याने भरपूर उपयोग केला . आपल्या प्रतिभेने त्याने या सर्वांचे मनोवेधक मिश्रण करून एक नवीन ‘ पुराण ’ च रचले असे म्हणता येईल . नंतरच्या कितीतरी कवींनी मुकुंदकवींचे अनुकरण केले . परंतु त्याच्या कल्पकतेची सर कुणालाच आली नाही . केवळ सोळाव्या शतकातीलच नव्हे , तर समस्त मध्ययुगातील एक श्रेष्ठ बंगाली कवी म्हणून त्याचे नाव आदराने घेतले जाते . काही वैष्णव काव्ये वगळता या प्रदीर्घ कालावधीत चंडीमंगल काव्यास जोड सापडणे दुर्घट ठरते .</p> <p style="text-align: justify; ">पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातील चैतन्य महाप्रभू ( १४८५ - १५३३ ) यांचा अविर्भाव ही घटना बंगालचे साहित्य , संस्कृती किंबहूना बंगाली जनांचे अवघे भावजीवन संस्कारीत करून गेली . चैतन्यांचे अवतारकार्य बंगालच्या इतिहासाला नवीन वळण देऊन गेले . त्यांच्या भक्तिपंथाने केवळ बंगालच्याच नव्हे , तर अन्य अनेक भागांतील जनगणांवर प्रभाव पाडला . [→ चैतन्य संप्रदाय ]. सहस्त्रावधी भाविकांना त्यांच्यामुळे उन्नत मनोभावाची आणि मुक्तीची वाट गवसली . जातिपातीचा विचार न करता अखिल मावनजात किंबहूना ‘ अवघे भूतजात ’ त्यांनी कृष्णदेवतेचा अंश म्हणून अंगीकारण्यास शिकवीले ; अन्नवस्त्राची दैनंदिन विवंचना क्षणभर बाजूस ठेवून मन ईश् वरतत्त्वाच्या उच्चतर चिंतनात मग्न करण्याचा धडा दिला . गावकुसाच्या क्षुद्र सीमा सांडून सर्वांनी एकत्र येऊन एक पंथ अनुसरावा यासाठी त्यांनी कळकळीने खटपट केली . चैतन्यांचा प्रभाव जीन प्रवाहांतून - संगीत , गीतिकविता आणि चरित्रवाङ्मय - बंगालच्या जनजीवनात मिसळला . बंगालच्या वैशिष्ट्यपूर्ण कीर्तनगायनाचा उगम व विकास चैतन्यांच्या आंदोलनाद्वाराच घडला आहे . खुद्द त्यांच्याच प्रेरणेने सामान्य नायकनायिकांची प्रणयगीते ही उन्नत व अध्यात्मसरपूर्ण अशा ‘ पदावली ’ त परिणत झाली . त्यांच्या अलौकिक उत्कट भक्तिभावाने प्रभावित झालेले कवी काव्यविषयांसाठी पोथ्या - पुराणांची पाने धुंडाळण्याचे सोडून देवलोकातून मृत्युलोकात उतरले . त्यांच्या हयातीतच त्यांच्यावर चरित्रकाव्याची रचना झाली असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही . बंगालीतील अनेक चैतन्यचरित्रगाथा या</p> <p style="text-align: justify; ">सोळाव्या शतकाच्या मध्यास व उत्तरार्धात रचलेल्या आहेत . त्या सर्वच बहुमोल आणि उद्बोधक आहेत . त्यांतही विशेष महत्त्वपूर्ण म्हणून वृंदावनदास ( सु . १५०७ - ?) यांचे चैतन्यभागवत ( सु . १५४० ) आणि कृष्णदास कविराज ( १५१७ - १६१४ ) यांचे चैतन्यचरितामृत ( सु . १५७० ) यांचा उल्लेख करावा लागेल . चैतन्यचरितामृत हा ग्रंथ तर वैष्णव मताचा ज्ञानकोशस्वरूप आहे . तत्त्वदर्शन , भक्तिनिरूपण आणि काव्य यांचा अपूर्व मिलाफ त्यात झाला आहे . फार काय जुन्या बंगाली साहित्यातील विश् ववाङ्मयात गणना होण्यासारखा एकमेव ग्रंथ म्हणून त्याचे नाव घेण्यात येते . या दोन ग्रंथांखेरीज गोविंददास कर्मकार ( पंधरावे - सोळावे शतक ) यांचा कडचा वा गोविंददासेर कडचा , जयानंद यांचे चैतन्यमंगल , लोचनदासांचे चैतन्यमंगल ही चैतन्यचरित्रे व भक्तिरत्नाकर , अद्वैतप्रकाश , प्रेमविलास ही चैतन्यभक्तांच्या जीवनलीला गाणारी काव्ये प्रसिद्ध आहेत .</p> <p style="text-align: justify; ">गीतिकवींपैकी अनेकजण चैतन्यांचे भक्त होते . काही जण भक्तांचे अनुगृहीत शिष्य - प्रशिष्य होते . चैतन्यांचे पदांक अनुसरून या मांदीयाळीने राधाप्रमाची गाढता अनुभवली होती आणि या समृद्ध भावानुभवानेच वैष्णव पदावलीस उच्च दर्जाच्या गीतिकवितेची पदवी प्राप्त करून दिली. गीतिकवितेची ( म्हणजेच ‘ पदावली ’ - साहित्याची ) एक रीती अवहठ्ठ ( अर्वाचीन अपभ्रंश ) मधून उगम पावून पूर्व भारतात खास करून मिथिला , वंगदेश , नेपाळ , उत्कल व आसाम येथील राजसभांतून गिरविली जात होती . हिचा विशिष्ठ भाषाछंद बंगालीमध्ये सोळाव्या शतकापासून व्यापक प्रमाणावर व्यवहृत आणि समाहृत झाला . एकोणिसाव्या शतकात त्यालाच ‘ ब्रजबुली ’ हे अभिधान चिकटले . सोळाव्या , सतराव्या आणि अठराव्या शतकांत अनेक वैष्णव कवींनी ब्रजबुलीतही पदरचना केली होती . त्यांच्यापैकी गोविंददास कविराज ( १५३५ - १६१३ ) आणि गोविंददास चक्रवर्ती ( सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध ) हे श्रेष्ठ मानले जातात . पदावली - साहित्य हा मध्ययुगातील एक अमोल ठेवा आहे . ज्ञानदास , बलराम दास , नरोत्तम दास ( सु . १५२८ - १६११ ) आदि कवींची पदे व पद - समुद्र , पदामृत - समुद्र , पद - कल्पतरु इ . संकलन ग्रंथ म्हणजे बंगाली भक्तिसागरास आलेल्या भरतीच्या लाटा आहे .</p> <p style="text-align: justify; ">चैतन्यांच्या आदेशानुसार सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांनी वृंदावन येथे वैष्णव साधना आणि शास्त्रचर्चा यांसाठी एक केंद्र स्थापन केले . रूप गोस्वामींच्या नाटक , खंडकाव्य व अलंकार ग्रंथादी संस्कृत भाषेतील रचना सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बंगाली पदावलींचे विषय आणि रचनाकारांचा दृष्टिकोन नियामक करणारे साहित्य म्हणून महत्त्वपूर्ण ठरतात . त्यांच्या शिरस्त्यांमुळे पदावली रचना सहजसाध्य झाली , तशीच ती साचेबंदही होऊ लागली . तिच्यातील पूर्वीची अंत ः स्फूर्त प्राणवत्ता कमी झाली . नंतरच्या कवींच्या ध्यानात ही त्रु टी न येती तरच नवल . नरोत्तम दासांसारख्या सहृदय कवी आणि भक्ताने ‘ किर्तनगान ’ हा तोडगा त्यावर काढला . किर्तनगानास त्यांनी वैष्णवांच्या मेळाव्यास बहिरंग साधनेचे प्रमुख अंग म्हणून स्थानापन्न केले . कीर्तनगानातील सूर आणि शास्त्र यांत विविधता आणि वैचित्र्य आणून त्यांनी त्यास एक नवीन लवचिकपणाची जोड दिली . मृदंगाच्या तालात व ‘ खोल ’ वादनात एक नवीन मोहकता आली . सोळाव्या शतकाच्या अंतिम पादात केंव्हातरी नरोत्तम दासांनी खेतरी ( खेतुरी ) या गावी नामकीर्तनाचा जो सोहळा आयोजीत केला होता त्यातूनच आजच्या कीर्तनगानाची मंदाकिनी उगम पावली आहे . ( बंगालमधील ‘ कीर्तन ’ हा सर्वस्वी ‘ गायन ’ प्रकार आहे . भक्तिरसपूर्ण भजनावली अधूनमधून गद्य निवेदनाद्धारा जुळवून घेत यात गायली जाते . महाराष्ट्रातील हरिदासी वा नारदीय कीर्तनसंस्था वेगळी आहे .)</p> <p style="text-align: justify; ">चैतन्यांनी प्रवर्तन केलेल्या वैष्णव मतांच्या प्रभावाने सोळाव्या शतकाच्या मध्यापासून श्रीमद्भागवत , महाभारत , रामायण व अन्य वैष्णव पुराणग्रंथांचे पठन , परिशीलन आणि अनुवादकरण वाढीस लागले . त्याचप्रमाणे रूप गोस्वामी आदी पंथाचार्यांचे व महंतांचे संस्कृत ग्रंथ , कधी संक्षेपाने तर कधी विस्ताराने , बंगालीत रूपांतरित होत राहीले . त्या काळातील या उपक्रमासच आजकाल ‘ अनुवादसाहित्य ’ म्हणून ओळखण्यात येते . या अनुवादांमुळे बंगाली भाषा व साहित्याची संपन्नता वाढली .</p> <p style="text-align: justify; ">वैष्णव पंथाच्या प्रसाराचा एक लक्षणीय भाग म्हणजे त्यामुळे समाजात लिहितावाचता येणाऱ् यांची संख्या वाढली . वैष्णव कुटुंबातील स्त्रियासुद्धा वैष्णवग्रंथांचे वाचन नित्यनेमाणे करता यावे म्हणून आग्रहाने अक्षरओळख करून घेऊ लागल्या . नरोत्तम दासांचे प्रार्थनापद तसेच पूर्वोल्लेखित चैतन्यभागवत , चैतन्यचरितामृत इ . ग्रंथ नित्यपठनीय ठरले . सोळाव्या शतकातील साहित्याची श्रीवृद्धी ही एकाच वेळी समाजातील विद्याप्रसारासमवेत होत गेल्याने पक्क्या पायाभरणीवर उभी राहिली व त्याचे दीर्घस्थायी परिणाम पुढे दिसून आले .</p> <p style="text-align: justify; ">चैतन्यांच्या धर्मप्रसारामुळे सोळाव्या शतकात बंगाली साहित्यात उच्च आणि कनिष्ठ असे दोन स्तर स्पष्टपणे दिसून येतात . पूर्वकालीन साहित्याच्या उपलब्ध उदाहरणांवरून आपल्याला त्याच्या सुविद्य , सुचिंतीत रचनाकारांची उच्चस्तरीय छाप जाणवते . कनिष्ठ स्तरावरील रचनेची स्वतंत्र उदाहरणे ठळकपणे अवगतच नाहीत . उच्च स्तरावरील ग्रंथांतरी उद्धृत झालेल्या स्फुट उताऱ् यांवरून आपण अटकळ करू शकतो इतकेच . उदा ., श्रीकृष्ण किर्तनाची कथा . सोळाव्या शतकाच्या मध्यापासून निम्न स्तरावरील साहित्य भद्र आणि शिष्ट साजशृंगार लेवून आणि वैष्णवभावापन्न होऊन उच्च स्तरावरील मानाच्या स्थानी विराजमान होऊ लागले . मुकुंद कवीचे चंडीमंगल दृष्टांतादाखल नमूद करता येईल . उच्च आणि निम्न स्तरांच्या संधीरेषेवर मनसामंगलसारख्या कृती येतात . मनसामंगल काय किंवा चंडीमंगल काय उभय काव्यांच्या कथावस्तू निम्न स्तरावरच उगम पावलेल्या आहेत . स्त्रियांच्या व्रतवैकल्यांच्या कहाण्या हेच त्यांचे मूलधन . कवी प्रतिभेने त्यांवर संस्कारांचे जडावकाम केले , तरीसुद्धा एक कविकंकणाचा अपवाद वगळता वरिष्ठ पुरोहितवर्गात त्यांना मान्यता मिळाली नव्हती . चंडीपूजा समाजाच्या सर्व थरांत प्रचलित झाली म्हणूनच चंडीमंगल काव्य सहजतया उच्च समाजात मान्यतेस पोहोचले . मनसादेवता वास्तविक चंडीपेक्षाही प्राचीन ; परंतु तिची पूजा सर्व स्तरांत स्विकृती पावली नसल्याने व जेथे ती प्रचलित होती तेथेही क्रमशः शबल होत गेल्याने मनसासाहित्याचा प्रत्यय अथवा प्रभाव वरिष्ठ वर्गात तितकासा जाणवत नाही .</p> <p style="text-align: justify; ">सतराव्या - अठराव्या शतकांत कितीतरी मनसामंगल काव्यांची रचना झाली . मात्र साहित्यांच्या निकषांवर उतरणारी कृती केवळ केतकदास या कवीचीच आहे . स्वतः स ‘ क्षेमानंद ’ असेही म्हणविणाऱ् या या कविने सतराव्या शतकाच्या मध्यास मुकुंद चक्रवर्तीचा आदर्श समोर ठेवून आपल्या मनसामंगल काव्याची रचना केली असावी . सरळ , सोप्या भाषेत त्याने आपली लोककथा रंगविली आहे . रसाळपणास त्याने कधी थिल्लर नखऱ् यांची बाधा होऊ दिली नाही . या काळातील श्रेष्ठ काव्यग्रंथ काशीराम दास यांचा पांडवविजय हा असून तो महाभारताच्या आधारे सतराव्या शतकाच्या आरंभी रचला गेला . लोकप्रियतेची कसोटी लक्षात धेता कृत्तीवासाच्या रामायणाखालोखाल काशीरामाचे हे महाभारतच बंगालमध्ये वाचले जाते . संपूर्ण ग्रंथ त्याच्या नावावर मोडत असला तरी पहिली चार पर्वेच त्याच्या हातची असून , पुढची दोन अथवा तीन त्याचा पुतण्या नंदराम याची व उर्वरीत नित्यानंद घोष व अन्य कवींची आहेत . आजही या ग्रंथाचा समादर बंगालमध्ये सर्वत्र आहे .</p> <p style="text-align: justify; ">सतराव्या शतकापासून एका नवीन मंगलकाव्याची धारा वाहू लागली . ती म्हणजे ‘ धर्ममंगल ’ काव्य . धर्मठाकूर वा धर्मदेवता ही एक प्राचीन देवता आहे . बंगालमध्ये किंबहुना समस्त पूर्व भारतात , फार पूर्वीपासून या देवतेच्या अस्तित्त्वाच्या खुणा आढळतात . वैदीक काळातील वरुण , यम , सोम , विष्ण व रुद्र एवढ्या देवतांचे गुणधर्म मिळून ‘ धर्म ’ या रूपहीन ‘ शून्य मूर्ति ’ देवतेची निर्मिती झालेली दिसते . या देवतेच्या महात्म्याची रचना व प्रचार करण्यासाठी अनेक प्राचीन आख्यायिका उपयुक्त ठरलेल्या आहेत . त्यांत वैदिक शुन ः शेपाचे आख्यानही येते . धर्ममंगलकार कवींपैकी प्रथमश्रेणीचा साहित्यस्त्रष्टा म्हणून रूपराम चक्रवर्तींचे नाव घ्यावे लागेल . सतरा व्या शतकाचा मध्यकाल ( १६४९ ) ही त्याची निश् चित जन्मतारीख आहे . या काव्याची केवळ आंशिक संहिताच मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत . तशी हस्तलिखिते बरीच ज्ञात असून त्यांचे चिकित्सित संपादन अपेक्षित आहे . रूपरामाच्या निर्व्याजमनोहर सरवंतीने आधीची धर्ममंगल काव्ये निः ष्प्रभ केली आणि नंतरही कुणा कवीस त्याच्याशी पैजा घेणे जमले नाही .</p> <p style="text-align: justify; ">सुलतानांच्या रियासतीत भाषा व्यवहाराचे बाबतीत बंगाली हिंदु व मुसलमान यांच्यात भेदाभेद नव्हता . दोन्ही समाज बंगाली भाषाच वापरीत मात्र सतरा व्या शतकापूर्वी कुणा बंगाली मुसलमानाने साहित्य निर्मिती केल्याचे उदाहरण नमूद नाही . पंधरा व्या शतकाच्या प्रारंभापासून तिबेटो - ब्रह्मी भाषिक अशा आराकान दरबारात बंगाली भाषा व संस्कृती यांचा प्रभाव दृग्गोचर होऊ लागतो . सोळा व्या शतकाच्या मध्यकाली आराकान राजसभेत बंगाली मंत्री , सेनापती , अधिकारी इ . वाढत्या संख्येने दिसतात . त्यामुळे आराकान दरबारचे सांस्कृतिक वातावरण बंगालमय होऊन , बंगाली गुणी जनांचा गौरव तेथे अगत्याने होऊ लागला . पंडीत , कवी , कलावंत तेथे येऊ लागले . अशा कवीजनांपैकीच एक दौलत काजी हा होता . सतरा व्या शतकाच्या प्रथमार्धात राज्य करणाऱ् या श्रीसुधर्म राजाचा सरदार आ श्रफ खान याचा हा दौलत काजी आश्रित होता व त्याच्याच सूचनेवरून दौलतने राजस्थानी भाषेत प्रचलित असणारे लोर - चंद्राने ही गाथा आपल्या काव्यासाठी निवडली . सती मयना या नावानेही हे काव्य ओळखले जाते . बंगाली मुसलमानाची अशी ही पहिली ज्ञात साहित्यकृती. काव्य पूर्ण करण्याआधीच दौलत अल्ला घरी गेला . आराकानचा दुसरा प्रसिद्ध कवी सैयद आलाओल ( १६०७ - ८० ) याने हे काव्य पुढे कित्येक वर्षांनी पुरे केले . दौलत काजीचा संस्कृत भाषेचा चांगला व्यासंग होता व वैष्णव पदावलीवरही प्रभुत्व होते . सैयद आलाओलची संस्कृतपेक्षा फार्सी भाषेशी जानपछान अधिक दिसते . त्याला संगीताचेही चांगले ज्ञान होते . मात्र कवी म्हणून त्याच्या पूर्वसूरींपेक्षा तो फिका ठरतो . तो कडवा धर्मनिष्ठ दिसतो व पुष्कळदा त्याची धार्मिकता त्याच्या कवित्वावर मात करताना दिसते . फार्सी व हिंदी रचनांवर आधारित अशी अनेक बंगाली काव्ये आलाओलने गुंफली . त्यांपैकी मलिक मुहंमद जायसीकृत पद्मावत या अवधी भाषेतील काव्याचे स्वच्छंद व सुडौल रूपांतर पद्मावती ( १६५१ ) हे श्रेष्ठ ठरते . सैफुल - मुलुक - वदिउज्जमाल या फार्सी काव्याचा त्याने केलेला अनुवादही प्रसिद्ध आहे . दारा शि कंदरनामा , इस्कंदरनामा , हफ्त पैकर ही त्याची आणखी काही बंगाली काव्ये .</p> <p style="text-align: justify; ">आलाओलनंतर आराकानमध्ये बंगाली काव्याची धारा लुप्तच झालीं . मात्र लगतच्या प्रदेशातील चितगॉंगच्या बंगाली मुसलमानांनी तो वसा पुढे चालविला . त्यांच्या बहुतेक ठळक रचना धर्म संबंधित आहेत . चितगॉंगच्या सैयद सुलतान या कवीने १६५४ मध्ये रसुल विजय ( किंवा नबी वं श ) या काव्याची रचना हरिवंशाच्या धर्तीवर केली . महाभारताच्या धर्तीवर ‘ जंगनामा ’ ( युद्धकाव्य ) काव्याची निर्मिती झाली . १६४५ मध्ये मुहंमद खान याने पीर शाह सुलतान या मुर्शीदाच्या ( धर्मगुरू ) इच्छे वरून लिहिलेला मौतुल हुसेन हा जंगनामा सर्वात जुने मुसलमानी युद्धकाव्य गणता येईल . क्वचित राधाचरण गोप सारख्या हिंदू कवीनेही जंगनामा रचलेला आढळतो . मात्र साहित्य गुणांचा विचार करता नंतरच्या काळात वैष्णव मंगलकाव्यांच्या धर्तीवर लिहिलेली मुस्लिम काव्ये वगळता या कवींच्या कर्तुत्वाच्या खुणा फारशा उल्लेखनीय नाहीत . याच काळातील एक लक्षणीय घटना म्हणजे चंडीमंगल व मनसा मंगल काव्यांतील आख्यानांवर झालेले मुस्लिम पीरांच्या कथांचे कलम. हिंदू व मुसलमान या दोन प्रमुख धर्म मतांच्या अनुयायांच्या सहजीवनातून धर्मकथांच्या मिलाफाची प्रक्रिया आकारास आली व सत्यपीर व सत्यनारायण या व्रतकथांचा जन्म झाला . १५५० मध्ये रचलेल्या शेखशुभोदय या ग्रंथापासून ही प्रवृत्ती दृष्टीस पडते व अठरा व्या शतकातील घ नराम कवी रत्न , रामेश् वर भट्टाचार्य व भारतचंद्र राय यांच्या ‘ सत्यनारायण पॉंचाली ’ काव्यांत ती प्रकर्षास पोचलेली दिसते . सत्यपीर ही संकरित देवता आहे. एकाच वेळी हिंदूंचा विष्णू व मुस्लिम सुफींचे उपास्यतत्त्व ‘ हक् ’ त्यामध्ये एकत्र विराजमान आहेत . अठरा व्या शतकात बाह्य धर्मकांडाचे अवडंबर माजले व अशा व्रतकथांची चलती झाली . मात्र साहित्य मूल्यांच्या दृष्टीने या सर्व रचना निरर्थक ठरतात .</p> <p style="text-align: justify; ">स्वतंत्रपणे हिंदूंच्या स्थानिक ग्रामदेवतांची वा लौकिक देवतांची छोटीछोटी मंगल काव्ये सतरा व्या शतकाच्या शेवटी रचली जाऊ लागली . स्त्रियांच्या व्रतांनिमित्त पूजिल्या जाणाऱ् या देवताही या काव्यांचे विषय होताना आढळतात . या धर्तीच्या काव्यप्रणेत्यांत सर्व प्रसिद्ध म्हणजे कवी कृष्णराम दास . त्याने व्याघ्रदेवता दक्षिण राय , नारीदेवता षष्ठी ( सटवाई ) आणि मरिआई ( महामारी ) ‘ शीतला ’ यांची मंगलकाव्ये लिहिली . याही रचना साहित्यगुणमंडित नसून केवळ समाजस्थितीच्या निदर्शक म्हणून उल्लेखनीय ठरतात .</p> <p style="text-align: justify; ">अठरा व्या शतकात साहित्यदृष्ट्या लक्षणीय अशी आणखी कोणतीच नवी वाट चोखाळलेली आढळत नाही . या काळातील अग्रगण्य कवी म्हणजे ‘ गुणाकर ’ पदवी विभूषित भारतचंद्र राय ( १७१२ - ६० ) याने मंगलकाव्य एका नवीनच मुशीत घडवले . नडीयाचा ( नवद्वीप ) जमीनदार राजा कृष्णचंद्र याच्या आश्रयाने आपले अन्नदामंगल हे बृहत्काव्य भारतचंद्रांनी तीन खंडांत लिहिले . या काव्याची रचना १७५२ मध्ये पूर्ण झाली . राजा कृष्णचंद्राने प्रतिष्ठापना केलेल्या अन्नपूर्णा देवीचे माहात्म्य सांगणारे मंगल काव्य प्रथत खंडात आहेत . दुसऱ् या खंडात राजघराण्याचा मूळ पुरुष भवानंद मुजुमदार याच्या वैभवप्राप्तीचे आख्यान येते . तिसरा खंड विद्यासुंदर आख्यानास वाहिला आहे . भारतचंद्रांना फार्सी भाषा अवगत होती . त्यामुळे त्यांच्या काव्याची माधुरी व रसवत्ता वाढली होती . अलंकार व छंद प्रयोग यांतही त्यांची हातोटी लक्ष वेधून घेते .</p> <p style="text-align: justify; ">विद्यासुंदरआख्यान शृंगारिक असून शाह बिरीद खान, गोविंददास, श्रीधर, कृष्णराम दास, बलराम चक्रवर्ती, आदि कवींनी त्यावर अगोदर काव्ये लिहिली होती व भारतचंद्रांच्या रचनेने उत्साहित होऊन राधाकांत मिश्र रामप्रसाद सेन ‘कविरंजन’, निधिराम चक्रवर्ती ‘कवीचंद्र’ व मधुसुदन चक्रवर्ती ‘कवींद्र’ यांनीही नंतर लिहिली. जवळपास शंभर वर्षे भारतचंद्रांच्या या काव्याचा लौकिक सर्वत्र दुमदुमत होता. अनेकांनी त्यांचा कित्ता गिरविला. रामप्रसाद सेन हा त्यांच्यात गुणात्मक दृष्ट्या प्रमुख मानावा लागतो. स्वतः शक्तीचा उपासक असूनही त्याने भक्तिरसपरिपूर्ण अशी अनेक पदे रचली . कालीकिर्तन , कृष्णकिर्तन इ . त्याची संगीतरचना त्याच्या विद्यासुंदरआख्यानाइतकीच प्रसिद्ध आहे .</p> <p style="text-align: justify; ">अठरा व्या शतकातील आणखी दोन कवी त्यांची प्रतिभेची चुणूक दाखवून गेले . विषयांची निवड , चरित्रचित्रण आणि शब्दसंपदा या बाबतींत त्यांचे प्रभुत्व लक्षणीय ठरते . धर्ममंगल ( १७२१ ) काव्याचा कर्ता घनराम चक्रवर्ती आणि शिवसंकीर्तन वा शिवायन ( १७१० ) या काव्याचा कर्ता रामेश् वर भट्टाचार्य हे ते दोघे कवी होत . लोकमानसात प्रचलित आणि प्रिय ठरलेल्या चंडीमंगल आख्यानास रामेश् वराच्या हाती ‘ भद्रकाव्या ’ चे रूप लाभले , ही त्याची किमया अजोड ठरते . याशिवाय याच कालखंडातील गंगाराम कवीचे जेमतेम दोनशे ओळींचे महाराष्ट्र पुराण हे काव्य किंवा राधामोहन कवीचे पथेर पॉंचाली हे काव्य साहित्य बाह्य कारणांसाठी का होईना ( तत्कालीन परिस्थितीवर किंचित प्रकाश टाकणारी म्हणून ) नोंद घेण्यासारखी ठरतात .</p> <p style="text-align: justify; ">धर्मपंथाची जनमतावरील पकड सैल होऊ लागली , कर्मकांडाचा काच कमी होऊ लागला तसा धर्मकाव्यांचा प्रसारही मंदावू लागला . अठरा व्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रक्रियेने मूळ धरलेले आढळते . याचेच आणखी एक गमक म्हणजे काही नवीन प्रवृत्तींचा उदय . प्रणयप्रधान वा ऐतिहासिक घटनांवर आधारित अशा कवनांची चलती वाढली . सर्वस्वी धर्मनिरपेक्ष , ऐहिक विषयांवर प्रथमच काव्य रचना होऊ लागली . कलकत्ता शहर आणि आसपासचा मुलुख या काळात ‘ कविवाला ’ शाहीर आणि नव्या धर्तीच्या छोट्या ‘ पॉंचाली ’ लिहिणाऱ् या कवींच्या शीघ्र काव्यांनी गजबजून गेला . शृंगारिक कवनांच्या शाहीरांत रामनिधी गुप्त ( निधुबाबू - १७४२ - १८३९ ) हे विख्यात आहेत . ‘ आखडाइ ’ ( बैठकी ) गायकीचा प्रणेता म्हणूनही त्याचे नाव स्मरणीय ठरते . हिंदुस्थानी संगीतातील ‘ टप्पा ’ त्यांनीच बंगालमध्ये आणला . निधुबाबूंखेरीज श्रीधर कथक , राम बसू , ( १७८७ - १८२९ ) व दाशरथी राय ( १८०६ - ५७ ) हे कवी जनप्रिय ठरले . दाशरथी राय यांनी पारंपारिक ‘ जात्रा ’ धर्तीची संगीत नाटके , किर्तनगान व ‘ कवीवाला ’ गीते यांचा मिलाफ करून नवीन पॉंचालीचे प्रयोग सुरू केले . कविवाला - शहिरांची ( महाराष्ट्रातील कलगी - तुरा , सवाल - जबाबांसारखी रचना ) कवित्व स्पर्धा हा एकोणिसा व्या शतकातील बंगाली लोकरंजनाचा एक महत्त्वाचा प्रकार होता . अँटनी फिरंगी , हरू ठाकूर , भोला भोवरा , कृष्णकमल गोस्वामी , मधुकान , ( १८१३ - ६८ ) इ . आणखी काही गायक - कवी या संदर्भात उल्लेखनीय आहेत . ही कवी परंपरा एकोणिसा व्या शतकाच्या बव्हंश भागात चालू राहिली .</p> <p style="text-align: justify; ">गोपीचंद - मयनामतीची गाणी , मैमनसिंग गीतिका , सहजिया पंथाची गीते , डाक आणि खना यांची वचने , महाराष्ट्रातील सहदेव भाडळीशी समतुल्य बाऊल फकिरांची भावसमृद्ध गीते ही या मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंडातील नमूद करण्यासारखी आणखी काही साहित्य सामग्री होय . साधक रामप्रसाद ( १८ वे शतक उत्तरार्ध ) या कवीची बालसुलभ निरागसतेने भरलेली उत्कट भक्तिगीते कालीस उद्देशून आळलेली असली , तरी आजही सर्व बंगाली जनांच्या भाव जीवनात आपले आदरणीय स्थान टिकवून आहेत .</p> <h3 style="text-align: justify; ">नवयुग</h3> <p style="text-align: justify; ">भारतचंद्रांच्या जीवन काळातच प्लासीची भाग्यनिर्णायक लढाई इंग्रजांनी जिंकली आणि भारताच्या इतिहासात एका नवीन अध्यायाचा आरंभ झाला . आठरा व्या शतकाच्या सात व्या दशकात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंगालमध्ये सुरू झाला . नवयुगाची चाहूल सांगणारी एक घटना म्हणजे कलकत्त्यात १७८४ मध्ये झालेली ‘ एशियाटिक सोसायटी ’ ची स्थापना . त्या आधी १७७८ मध्ये बंगाली छापखान्याने मूळ धरले होते . सरकारी गरजेपोटी बंगाली भाषेचा वापर करण्याची व त्या भाषेस उत्तेजन देण्याची आवश्यकता गोऱ् या अंमलदारांना भासू लागली . जरूरीच्या कायदेकानूंचे व सरकारी धोरण नमूद करणाऱ् या प्रस्तावांचे बंगाली अनुवाद अटळ ठरले . बंगाली साहित्याची वाट येथून रूंदावू लागली .</p> <p style="text-align: justify; ">आधीच्या शतकात काही फुटकळ दस्तऐचज सोडले तर गद्यरचना फारशी आढळत नाही . गद्य हे साहित्या चे माध्यम होऊ शकते हा विचारच त्याकाळी कुणाच्या ध्यानीमनी आला नाही . काही वैष्णव साधकांनी आपल्या चेल्यांसाठी लहानसहान उपदेश वजा प्रकरणे , प्रश् नोत्तरी इ . लिहिली होती . पोर्तुगीज मिशनऱ् यांनी त्यांच्या धर्मांतरित बंगाली प्रजेसाठी काही उपदेशपर निबंध लिहिले त्यापैकी कृपाशास्त्रेर अर्थभेद हा पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे १७४२ मध्ये रोमन लिपीत मुद्रित झालेल बंगाली ग्रंथ उल्लेखनीय ठरतो . मात्र वैष्णव महंत काय किंवा पोर्तुगीज ख्रिस्ती धर्मप्रसारक काय , कुणाच्या प्रयत्नांची परिणती बंगाली गद्यास ठोस साहित्यरूप देण्यात झाली नाही .</p> <p style="text-align: justify; ">विलायतेहून नव्याने भारतात आलेल्या ब्रिटीश चाकरमान्यांना देशी भाषांचे व संस्कृत-फार्सी सारख्या भाषांचे धडे देण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या चालकांनी एकोणिसा व्या शतकाच्या शुभारंभीच कलकत्ता येथे ‘ कॉलेज फोर्ट विल्यम ’ ची स्थापना केली . बोटीवरील शल्यविशारदाचे काम टाकून हिंदी भाषक रस घेणाऱ् या गिलख्रिस्टसारख्या पंडीताने या पाठशाळेची धुरा प्रथम वाहिली . बंगाली वगैरे देशी भाषांचे अध्यापक व प्राचार्य म्हणून सेरामपूर येथील बॅप्टिस्ट मिशनचे पाद्री विल्यम कॅरी ( १७६१ - १८३४ ) यांची लवकरच नेमणूक झाली . त्यांनी स्वतः बंगाली व्याकरणाची रचना केली , एक बंगाली शब्दकोश तयार केला व दोन बंगाली पाठ्यपुस्तके संकलित केली . बायबलच्या देशी भाषांतील अनुवादाच्या कार्यात ते आधीपासूनच समरस झाले होते . बंगाली गद्याचा साहित्यिक अवतार घडविण्यात त्यांचा वाटा मोठा आहे . त्यांनीच काही बंगाली शिक्षकांना हाताशी धरून बंगालीत गद्य ग्रंथ लिहवून घेतले व सेरामपूर मुक्कामी ते छापवून घेऊन त्यांचा प्रसार केला . विदेशी विद्यार्थ्यांना पाठ्यसामग्री मिळावी हा त्यांचा उद्देश ध्यानी ठेवूनही आरंभीच्या काळातील त्यांचे परिश्रम कौतुकास्पद ठरतात . एकोणिसा व्या शतकाच्या दुसऱ् या दशकाच्या अखेरीस जेव्हा एतद्दे शीयांसाठी शाळा - महाविद्यालये निघू लागली तेव्ही फोर्ट विल्यम कॉलेजच्या शिक्षकांनी तयार केलेली पुस्तकेच आरंभीची गरज भागविण्यास कामी आली .</p> <p style="text-align: justify; ">फोर्ट विल्यम कॉलेजच्या पुढाकाराने बंगाली गद्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बंगाली गद्यकारांत दोन - तीन ठळकपणे उल्लेखनीय ठरतात . एक म्हणजे कॅरीसाहेबांचे मुन्शी रामराम बसू ( मृ . १८१३ ). हे फार्सी भाषेचे तज्ञ असून कॅरीचे बंगाली भाषाशिक्षक होते . महाराजा प्रतापादित्य चरित्र ( १८०१ ) आणि लिपिमाला ( १८०२ ) हे यांचे दोन बंगाली ग्रंथ प्रसिद्ध आहेत . प्रथमोल्लेखित ग्रंथात यशोहर ( जेसोर ) चा राजा प्रतापादित्य याचे सुबोध चरित्रकथन आहे व दुसऱ् या पुस्तकात निबंध व पत्रात्मक विषयविवरण आहे . त्या काळातील प्रचलित बंगाली बोलीचा नमुना या पुस्तकात आपणास आढळतो . कॅरीचे संस्कृत शिक्षक पंडित मृत्युंजय विद्यालंकार ( मृ . १८१९ ) यांनी अनेक पुस्तके लिहिली . त्यांपैकी बरीचशी संस्कृत ग्रंथांची बंगाली रूपांतरे आहेत . उदा . बत्रीश सिंहासन ( १८०२ ), हितोपदेश ( १८०८ ). राजावली ( १८०८ ) हा बंगालीतील पहिला इतिहासपर ग्रंथ ; यात मोंगल तवारीखकारांच्या आधारे लिहिलेल्या एका समकालीन संस्कृत ग्रंथाचा गोषवारा आहे . या ग्रंथाखेरीज प्रबोधचंद्रिका ( १८३३, मरणोत्तर प्रकाशित ) हा त्यांचा ग्रंथही विख्यात आहे . या ग्रंथात पंडिती गद्यशैली आणि प्रचलित व्यवहारभाषा या उभयतांचे दाखले आढळतात . मृत्यूंजयांचा वेदांतचंद्रिका ( १८१७ ) हा राजा राममोहन रॉय ( १७७४ - १८३३ ) यांच्या एकेश् वरी मताचे खंडन करण्यासाठी लिहिलेला व स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेला ग्रंथही उल्लेखनीय आहे . फोर्ट विल्यममधील शिक्षकांपैकी राजीवलोचन मुखर्जी यांचा महाराज कृष्णचंद्र रायस्य चरितम् हा १८०५ साली सेरामपूर येथे छापलेला बंगाली ग्रंथ त्याच्या सोप्या , बाळबोध भाषेसाठी लक्षणीय ठरतो .</p> <p style="text-align: justify; ">एकोणिसा व्या शतकाच्या दुसऱ् या दशकाच्या मध्यास राजा राममोहन रॉय हे वेदान्तसूत्रे व उपनिषदे यांचे अनुवादक म्हणून बंगाली साहित्यक्षितिजावर दिसू लागले . केवळ पाठ्यपुस्तकांचे रचनाकार म्हणून नव्हे , तर स्वतंत्र विचारसरणीचा उद्यमी लोकधुरीण व आग्रही मतप्रतिपादक म्हणून त्यांची कामगिरी चिरस्मरणीय ठरते . त्यांचे विचार कॅरीप्रभृती ख्रिस्ती धर्मपालकांना रुचले नाहीत तसेच हिंदू धर्ममार्तंडांनाही ते श्रुतिसुखद ठरले नाही . या दोन्ही दळांशी राममोहनांना सामना करावा लागला . मृत्युंजय विद्यालंकार यांच्याशीही त्यांनी दोन हात केले . या वादातील पुस्तिकांवरून आज आपणास राममोहनांच्या गद्यशैलीची प्रचीती येते . हे उभय प्रतिस्पर्धी बंगाली गद्यसाहित्याच्या उपक्रमाचे आणि क्रमविकासाचे आघाडीचे कर्ते पुरुष म्हणून आज गणले जातात .</p> <p style="text-align: justify; ">गद्यकार म्हणून या उभयतांची नावे एकत्र उच्चारली तरी नव्या बंगालच्या नवजागरणाचा उद्गाता म्हणून राममोहन रॉय यांची स्वतंत्र कर्तबगारी अन्य कोणापेक्षाही श्रेष्ठ होती . सत्यशोधकाची कळकळ , सर्वधर्मतत्त्वांचा समन्वय घडवू पाहणारी क्रांतदर्शी दृष्टी , रूढी , कर्मकांड आणि अंधविश् वास यांच्याविरुद्ध उभारलेले बंडाचे निशाण , चिकित्सक विश् लेषणाची काटेकोर बुद्धी इ . गुणांमुळे त्यांनी नवीन वारे खेळविले . बंगाली गद्य त्यांच्या हाती या नवमताच्या प्रसाराचे धारदार शस्त्र ठरले . तत्त्वज्ञानासारखा विषय या भाषेतही मांडता येतो हे दाखवून त्यांनी एक आत्मविश् वास निर्माण केला . पुढील पिढ्यांना ही जाणीव उपकारक ठरली . त्यांचे हे ॠण थेट रवींद्रनाथांपर्यंत सर्वांनाच स्मरावे लागले . संस्कृत , फार्सी , इंग्रजी ( व थोडीशी अरबी ) या भाषांचे ज्ञान असूनही त्यांची भाषा जडजंबाल झाली नाही . ती रोखठोक आणि परिणामकारक आहे . भगवद्गीतेचा पद्यानुवाद त्यांनी केला तसेच बंगालीचे उत्कृष्ट व्याकरणही लिहिले . काही पदेही त्यांनी रचली असून आजतागायत ती प्रचारात आहेत.</p> <p style="text-align: justify; ">सेरामपूरस्थ मिशनरी मंडळींनी १८१८ साली प्रथम बंगाली नियतकालिका समाचार दर्पण काढून बंगाली भाषा आणि साहित्य यांच्या उन्नतीचा दिंडी - दरवाजाच खुला केला . लवकरच कलकत्ता शहरातील पुढारी मंडळींनी हा कित्ता गिरविला . वृत्तपत्रांचे पेव फुटले . स्वतः राममोहन रॉय यांनीही काही काळ एक पत्र चालविले . नव्या नवलाईच्या या बंगाली वृत्तपत्रसृष्टीत भवानीचरण बंदोपाध्याय यांचे समाचार - चंद्रिका ( १८२१ ) हे पत्र श्रेष्ठ होते . या नियतकालिकांनी बंगाली गद्याची गंगा घरोघर पोहोचविली . फोर्ट विल्यमच्या पाठ्यपुस्तकांनी वा राममोहनांच्या वादविवादांनी जे साधले होते त्या हून शतपटीने अधिक या नियतकालिकांच्या सार्वत्रिक प्रसाराने साधले . कारण बंगालखेरीज अन्यभाषा व येणाऱ् या रयतेला जगाची चाहूल घरबसल्या लागू लागली . समसामायिक साहित्याच्या प्रगतीतही या वृत्तपत्रांचा वाटा मोठा आहे . १८३१ मध्ये ईश् वरचंद्र गुप्त ( १८१२ - ५९ ) यांनी संवाद प्रभाकर हे पत्र काढले . संवाद प्रभाकराचा उदय ही साहित्येतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरते .</p> <p style="text-align: justify; ">संवाद प्रभाकर पत्राच्या ऐतिहासिक कामगिरीक डे वळण्यापूर्वी आणखी काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा उल्लेख करावयास हवा . १८१७ मध्ये सरकारने एतद्देशीय विद्यार्थ्यांसाठी पाश् चिमात्य धर्तीवर उच्च शिक्षण देणारे ‘ हिंदू कॉलेज ’ काढले . या संस्थेचे विद्यार्थी इंग्रजी भाषा व साहित्य यांच्या यांच्या अध्ययनाने सुशिक्षित तर झालेच , परंतु पाश् चात्त्य तत्वज्ञान , विज्ञान व राजकीय विचारांची परिचय झाल्याने ते सद्यः परिस्थितीत नव्याने विचार करू लागले . डिरोजिओ आणि रिवर्ड्सनसारख्या स्वतंत्रप्रज्ञ प्राध्यापकांच्या सान्निध्यात हिंदू कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खऱ् याखुऱ् या शिक्षणाचा लाभ झाला . त्यांच्यापैकी जे भावनाप्रवण विद्यार्थी पाश् चात्य विचारांनी दिपून गेले ( त्यांना ‘ इंग - बंग ’ - इंग्रजी + बंगाली - म्हणण्याचा प्रघात आहे ) , त्यांनी सनातनी आचारवि चारांच्या जोखडातून हिंदू समाजाची सुटका व्हावी यासाठी खटपट केली . समाजापासून दुरावल्याने यांपैकी काहीजण ख्रिस्तीधर्माकडे ओढले गेले . काहींनी विचारपुर्वक त्या धर्माचा उघड स्वीकार केला . ख्रिस्ती होवोत अगर हिंदू राहोत या हिंदू कॉलेजच्या रूचिसंपन्न आणि स्वच्छदृष्टी विद्यार्थ्यांनी बंगाली साहित्यात विचारांची नवी हवा खेळविली .</p> <p style="text-align: justify; ">या विद्यार्थ्यांपैकी कृष्णमोहन बंदोपाध्याय (१८१३ - ८५) हे ख्रिस्ती धर्म स्विकारून पुढे रेव्हरंडही झाले . बंगाली लेखक म्हणून कीर्तिवंत झालेल्या तत्कालीन विद्यार्थ्यात ते मानाने पहिले . तरुण वयात त्यांनी द पर्सिक्यूटेड (१८३२ ) हे आधुनिक धर्तीचे प्रथम भारतीय नाटक इंग्रजीत लिहिले . संस्कृत , ग्रीक , लॅटिन , हिब्रु अशा विविध भाषांचा त्यांचा व्यासंग होता . संस्कृत विद्या आणि दर्शनादी शास्त्रातील त्यांच्या असाधारण पारदर्शितेबद्दल सर्वत्र आदर होता . उच्च शिक्षणार्थींच्या उपयोगासाठी त्यांनी स्वतः अहोरात्र खपून सतरा खंडांचा एक बंगाली विश् वकोश विद्याकल्पद्रुम त यार केला . त्यात इतिहास , तत्त्वज्ञान , विज्ञान , नीतिशास्त्र , साहित्य इ . विषयांतील ज्ञानाचा सारसंग्रह होता . इंग्रजी लेख त्यात बंगाली अनुवादांसह दिले होते (१८४६ - ५१). बंगाली गद्याच्या वाटचालीत हा कोश एक महत्वाचा मैलाचा दगड ठरतो .</p> <p style="text-align: justify; ">रे. कृष्णमोहन जरी हिंदू कॉलेजच्या विद्यार्थ्यांत ज्येष्ठ गणले जात असले, तरी उज्ज्वल प्रतिभावंत म्हणून मायकेल मधुसूदन दत्त यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्याखेरीज या प्रभावळीत देवेंद्रनाथ ठाकूर, राजेंद्रलाल मित्र, प्यारीचॉंद मित्र, राजनारायण बसू, भूदेव मुखोपाध्याय आणि द्विजेंद्रनाथ ठाकूर या श्रेष्ठांची गणना होते. हिंदू कॉलेजचे बंगाली साहित्यास वरदान म्हणजे हि विद्वत् परंपरा.</p> <p style="text-align: justify; ">कृष्णमोहनांचेच एक समकालीन ईश्वरचंद्र विद्यासागर (१८२० - ९१) यांनी संस्कृत कॉलेजाभोवती असाच साहित्यिकांचा मेळावा जमवला. स्वतः ईश्वरचंद्रांनी बंगाली गद्यांची ‘साधू भाषा’ शैली साहित्य आणि लोक व्यवहार अशा उभय कारणासाठी समर्थपणे वापरण्यात सुयश मिळविले. त्यामुळे अनुगामी लेखकांचा मार्ग प्रशस्त झाला. त्यांच्या ग्रंथांपैकी वेतालपंचविंशती (१८४७), शकुंतला (१८५४) व सीतार बनवास (१८६०) हे ग्रंथ पाठ्यपुस्तके म्हणून जरी लिहिले गेले, तरी साहित्यरचनेचा आदर्शपाठ म्हणून लोकमान्य ठरले. विधवाविवाहविषयक त्यांची दोन पुस्तके (१८५५) निर्भिड विचारसरणी आणि तर्कपूत युक्तीवाद या दृष्टीनी उत्कृष्ट ठरतात. १८५१ साली लिहिलेल्या संस्कृत साहित्यविषयक प्रस्ताव या त्यांच्या निबंधात टिकासाहित्याचा प्रथम उल्लेखनीय मानदंड आढळतो. एक राजकारण वगळता, समाजाच्या जिव्हाळ्याच्या विविध विषयावर विद्यासागरांची मुलभूत, करारी, निःस्पृह आणि स्वतंत्र बाण्याची आग्रही विचारसरणी या काळात एकसारखी प्रगट होत होती. बंगाली साहित्याच्या नवयुगारंभीचे सर्वाधिक नवभारतीय व्यक्तिमत्व म्हणून विद्यासागरांचे नाव आदराने घेतले जाते.</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand10/index.php/23-2015-01-14-05-36-17/9897-2012-03-21-13-23-39?showall=1&limitstart=" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">मराठी विश्वकोश</a></p> </div>