<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">जैन शौरसैनी भाषेतील षट्खंडागम ह्या दिगंबर जैन तत्त्वज्ञानपर ग्रंथाचा सहावा खंड, महाबंध ह्या नावानेही तो ओळखला जातो. आचार्य भूतबली (इ. स. चे दुसरे शतक) हा त्याचा कर्ता.</p> <p style="text-align: justify; ">चाळीस हजार श्लोकसंख्या असलेल्या ह्या ग्रंथाचे सात भाग असून त्यांत जीव व कर्म ह्यांच्या बंधप्रकारांची प्रकृती, स्थिती, अनुभाग व प्रदेश ह्या दृष्टींनी सखोल व प्रदीर्घ चर्चा केलेली आहे.</p> <p style="text-align: justify; ">हा ग्रंथ १९१५ पर्यंत कर्नाटकातील मुडिविद्री मठात अज्ञात अवस्थेत राहिलेला होता. १९४७−५८ ह्या कालखंडात काशी येथील भारतीय ज्ञानपीठातर्फे तो सात भागांत प्रकाशित करण्यात आला. आ. ने. उपाध्ये, हिरालाल जैन आणि सुमेरुचंद दिवाकर ह्यांनी तो संपादिला आहे.</p> <p style="text-align: justify; ">लेखक: ग. वा. तगारे</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=10500" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">मराठी विश्वकोश</a></p> </div>