<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">वेशीवरच्या पाऊलखुणा : : आंबे दिंडोरी</p> <p style="text-align: justify; ">झुंझार आंबेगाव</p> <p style="text-align: justify; ">आजूबाजूची परिस्थितीही एखाद्या गावाचे नाव ठरवून टाकते. अशी अनेक गावे नाशिक परिसरात आहेत. मात्र गावाच्या आजूबाजूला बहरलेल्या आमराईने त्या गावाला ‘आंबे’ असे नाव दिले. मात्र गावाच्या इतिहासाला मोहर आला तो कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या झुंझार कामगिरीने. हा मोहर इतका काही दरवळला की, महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह असो वा नाशिकचा विकास असो. या सर्वांसाठी एक अनोखे नेतृत्त्व आंबेगावने दिले. आंबेगावला तलवारबहाद्दर म्हणून ओळखले गेलेले राजेबहाद्दरांच्या खाणाखुणा गावचे वेगळेपण दाखवितात. म्हणून पराक्रमांनी दरवळलेले आंबेगाव झुंझार ठरते.</p> <p style="text-align: justify; ">नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील म्हसरूळ गावापासून उत्तरेला साधारण १८ किलोमीटरवर आंबेगाव हे टुमदार गाव पहायला मिळते. या रस्त्याने जाताना वरवंडी व शिवनई ही लहान गावेही पहायला मिळतात. गावात प्रवेश करताना आंब्याची झाडे लक्ष वेधून घेतात. मात्र पूर्वी एवढी आंब्याची झाडे आता गावाभोवती पहायला मिळत नाहीत. पूर्वी आंबेगावाच्या आजूबाजूला आठही दिशांना बाराबलुतेदारांच्या अनेक आमराई होत्या. त्यामुळेच गावाला आंबे गाव असे नाव पडल्याचे गावातील ज्येष्ठ सांगतात. पूर्वी आंबेगावला जानोरी आंबेगावही म्हटले जायचे मात्र आता दिंडोरी आंबेगाव असे म्हटले जाते. गावात जाताना या गावाच्या अंगाला लागून वाहणारी बाणगंगा नदी रामायण काळाची आठवण करून देते. रामशेज डोंगराच्या पर्वतराईत उगम पावलेल्या बाणगंगा नदीचा सहवास आंबे गावाला लाभला आहे.</p> <p style="text-align: justify; ">प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई दंडकारण्यात वनवासात असताना सीतामाईला तहान लागली. जवळपासचे नाले, ओढे कोरडे पडले होते. हे लक्षात आल्यावर रामाने रामशेजवळील एका डोंगरावर बाण मारला. बाण लागताच त्या डोंगरामधून झरा फुटला आणि तो वाहू लागला. त्या झऱ्याचे पाणी प्राशन करून सीतामाईने आपली तृष्णा भागविली. तेव्हापासून या नदीला ‘बाणगंगा’असे नाव पडले, अशी अख्यायिका सांगितली जाते. गावाला जसे पौराणिक महत्त्व आहे तसेच ऐतिहासिकदृष्ट्याही गाव महत्त्वाचे ठरते. बाणगंगेच्या तिरावर असलेले महादेव मंदिर, दगडाने सजलेला नदीघाट, वेशींचे तट आणि गावातून नदीपर्यंत पसरलेला राजेबहाद्दरांचा वाडा हे सर्वकाही पाहण्यासारखे आहे. याच गावात नारोशंकर राजेबहाद्दर यांच्या पाऊलखुणांची साक्ष येथील राजेबहाद्दरांचा टुमदार वाडा देतो. वाड्याचे कोसळलेले बुरूज आजही इतिहास सांगतात.</p> <p style="text-align: justify; ">पेशवाईतील पाऊलखुणा पुसट वाटत असल्यातरी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने आंबेगावची ओळख अधिक ठळक केली. भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२) हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सहकारी होते. नाशिकमधील मल्हारखाणीत बाबासाहेब बुडत असताना दादासाहेबांनी त्यांचा जीव वाचविला होता, अशी आठवण खुद्द बाबासाहेबांनी त्र्यंबकेश्वरच्या एका कार्यक्रमात सांगितली होती. अस्पृश्यांसाठी पाणवठे खुले करण्यासाठी दादासाहेबांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक गावात चळवळ उभी करून विहिरी अस्पृश्यांना खुल्या केल्या होत्या. उमराळे गावातील ‘विहीर सत्याग्रह’ प्रसिद्ध आहे. आंबेगावात तर हा भेदाभेद त्यांच्या आजोबांपासून नव्हता. बाबासाहेबांनी स्थगित केलेले महाडचे चवदार तळ्याचे आंदोलन दादासाहेब गायकवाडांच्या विद्रोही भूमिकेमुळे पुन्हा पेटून उठले होते.</p> <p style="text-align: justify; ">येथेच बाबासाहेबांना आंबेगावच्या झुंझार नेतृत्त्वाची ओळख झाली. २ मार्च १९३० च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश लढा सुरू झाला असला तरी त्याची सर्व जबाबदारी बाबासाहेबांनी दादासाहेबांच्या खांद्यावर दिली होती. पाच वर्षे चाललेल्या या लढ्यात दादासाहेबांनी केलेली कामगिरी आजही ठळकपणे इतिहासात नोंदली गेली आहे. फक्त अस्पृश्यांसाठीचे लढेच नाहीत, तर ब्रिटिशांविरोधातील व भूमिहीनांच्या हक्कासाठीच्या लढ्यातही दादासाहेबांनी नेतृत्त्व केले. पुण्यातील ब्रिटिश योजनेविरूद्धचा सत्याग्रही विशेष गाजला. दादासाहेब अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. १९३७ ते १९४६ या काळात दादासाहेब गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७-५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेतेही होते. १९६२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. दादासाहेब नाशिक नगरपालिकेपासून संसदेपर्यंत सक्रिय होते. आंबेगावातून नेतृत्त्वाची तलवार घेऊन उदयास आलेल्या दादासाहेबांच्या कामगिरीची प्रचिती आजही आंबेगावात येते. म्हणूनच आंबे गावाला ‘रांगड्यांचे आंबेगाव’ असेही म्हटले जाते, अशी आठवण दादासाहेबांचे नातू राजेंद्र गायकवाड व पणतू सागर गायकवाड सांगतात.</p> <p style="text-align: justify; ">२९ डिसेंबर १९७१ रोजी दादासाहेबांचा मृत्यू झाला. यशवंत पटांगणात दादासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले. २००२ मध्ये जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त दादासाहेबांच्या नावाने गावाला सभागृह उभारण्याची घोषणा झाली. मात्र हे सभागृह उभारण्यासाठी गायकवाड कुटुंबीय व आंबेच्या ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. त्यानंतर हे सभागृह उभे राहिले. मात्र येथेही श्रेयाच्या पक्षीय राजकारणात या सभागृहाची हेळसांड सुरू असून, १० वर्षांनंतरही या सभागृहाचे उद्घाटन होऊ शकलेले नाही. या सभागृहात वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करतात. दादासाहेबांचे आंबेगावातील घर देखील अनोखे आहे. घरातील अनेक जुने फोटो आपल्याला पुन्हा त्या चळवळींच्या इतिहासात घेऊन जातात. दादासाहेबांचे वाडावजा घर इतके मोठे आहे की, तीन भिंतीचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घरात शंभर लोक राहत, असे गायकवाड कुटुंबीय सांगतात. राज्य सरकारने दादासाहेबांचे घर स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर गायकवाड कुटुंबीयांनी घराचा ताबा सोडला. मात्र, आजतागायत हे घर सरकारने स्मारकासाठी ताब्यात न घेतल्याने घराची पडझड सुरू झाली आहे. या घरात कर्मवीर दादासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणीही आंबेकर व्यक्त करतात.</p> <p style="text-align: justify; ">चीनच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान पंडित नेहरूंनी संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलविले. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री तर झाले, पण त्यांना सहा महिन्यात संसद सदस्य होणे बंधनकारक होते. दरम्यान, नाशिकचे खासदार गो. ह. देशपांडे यांचे १९६२ मध्ये निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक लागली व या जागेवर यशवंतराव चव्हाणांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. मात्र दादासाहेब हा एक अडसर सर्वांसमोर होता. दादासाहेब यशवंतराव चव्हाण यांचा रक्तदाब वाढवतील, अशी चर्चा रंगू लागली मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली. असे म्हटले जाते की, याबदल्यात नाशिकला एचएल हा मिग कारखाना मिळाला. १६ एप्रिल १९६८ रोजी दादासाहेबांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. हा क्षणही आंबेकरांसाठी उत्सव ठरल्याच्या आठवणीही ग्रामस्थ सांगतात. जानेवारी १९७६ च्या एका स्मरणिकेत दादासाहेबांना उद्देशून कुसुमाग्रज म्हणतात ‘हे पांथा, अंध तिमिर उजळण्यास... जाळित निज जीवन तू.... हात दुर्बला दिलास.... दलितांच्या मुक्तीचा आशापथ उजळला...!’ यावरून आंबेकर सुपुत्राची महती लक्षात यावी.</p> <p style="text-align: justify; "> </p> <div id="_mcePaste">लेखक : रमेश पडवळ</div> </div>